*पोंभुर्णा येथे सीसीआय चे केंद्र सुरू करावे व कापूस खरेदी जलदगतीने पूर्ण करावी – आ. सुधीर मुनगंटीवार*
*केंद्रीय वस्त्रोद्योग मंत्री श्रीमती स्मृती ईराणी यांच्याकडे केली मागणी*
कोरपना प्रतिनिधी-गौतम धोटे
कोरपना : तामिलनाडू व तेलंगणा या राज्यातील कापूस खरेदी पूर्ण झाल्यामुळे तेथील ग्रेडर महाराष्ट्रात मागवून कापूस खरेदी जलदगतीने पूर्ण करावी तसेच चंद्रपूर जिल्हयातील पोंभुर्णा येथे सीसीआय चे केंद्र सुरू करावे, अशी मागणी माजी अर्थमंत्री आ. सुधीर मुनगंटीवार यांनी केंद्रीय वस्त्रोद्योग मंत्री श्रीमती स्मृती ईराणी व महाराष्ट्राचे पणन मंत्री बाळासाहेब पाटील यांच्याकडे केली आहे.
श्रीमती स्मृती ईराणी आणि बाळासाहेब पाटील यांना सदर मागणीसंदर्भात ईमेल द्वारे त्यांनी पत्रे पाठविली आहेत. चंद्रपूर जिल्हयात सीसीआय चे केवळ दोन केंद्र सद्यःस्थितीत सुरू आहे. मोठया प्रमाणावर कापूस उत्पादन करणा-या या जिल्हयात आणखी एक केंद्र सुरू करण्याची आवश्यकता आहे. जिल्हयातील 30 हजार पेक्षा जास्त कापूस उत्पादकांनी कापूस खेरदीचा प्रस्ताव सीसीआय व फेडरेशनला दिला आहे. मात्र शारिरीक अंतर राखण्याच्या धोरणानुसार एका दिवसात 40 पेक्षा जास्त गाडया खरिदी होत नसल्याचे दिसुन येत आहे. या गतीने जर कापूस खेरदी सुरू राहीली तर 7 जून पासून मृग नक्षत्राचा पासून पडल्यास शेतक-यांचे मोठया प्रमाणावर नुकसान होण्याची शक्यता नाकरता येत नाही. यासंदर्भात महाराष्ट्र शासनाच्या पणन विभागातर्फे ग्रेडर नसल्याची सबब सांगीतली जात आहे. तामीलनाडू व तेलंगणा या राज्यातील कापूस खरेदी पूर्ण झाली आहे. त्यामुळे या राज्यातील ग्रेडर महाराष्ट्रात पाठवून येथील कापूस खरेदी जलदगतीने पूर्ण करण्याची मागणी आ. मुनगंटीवार यांनी केंद्रीय वस्त्रोद्योग मंत्री स्मृती ईराणी यांच्याकडे केली आहे. चंद्रपूर जिल्हयात पोंभुर्णा येथे कापूस खरेदी केंद्र सुरू करावे, असेही त्यांनी श्रीमती स्मृती ईराणी यांना पाठविलेल्या पत्रात म्हटले आहे.